भारतीय इतिहासात काही स्त्रिया अशा होऊन गेल्या आहेत, ज्या फक्त सौंदर्याने नव्हे तर बुद्धिमत्तेनेही अविस्मरणीय ठरल्या. तर काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी राजदरबारातील नृत्यांगना म्हणून सुरुवात केली आणि काळाच्या प्रवाहात त्या विदुषी, दानशूर आणि समाजकार्यात गुंतलेल्या महान स्त्रिया म्हणून ओळखल्या गेल्या.त्या काळाच्या सीमांना ओलांडून, पुरुषप्रधान समाजात स्वतःचा ठसा उमटवून गेल्या. अशाच तेजस्वी व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे चालुक्य काळातील विजयाभट्टारिका.
चालुक्य घराण्याच्या सुवर्णयुगात (इ.स. ६००–७५०) ज्या स्त्रियांनी राजकारण, साहित्य आणि धर्मसंस्कृती यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यात विजयाभट्टारिका हे नाव तेजस्वीपणे उभे राहते. तिचे जीवन हे मंदिरातील नर्तिका म्हणून आरंभले .नर्तिका असूनही कवयित्री, प्रशासक आणि दानशूर स्त्री म्हणून प्रसिद्ध झाली
बदामीच्या महान सम्राट पुलकेशी द्वितीयच्या पाच पुत्रांपैकी दुसरा चंद्रादित्य उर्फ विजयादित्य हा तिच्या प्रेमात पडला होता. त्या काळी नर्तिका ही केवळ दरबाराची शोभा मानली जात असे, परंतु विजयाभट्टारिकेने या संकल्पनेलाच नवा अर्थ दिला. तिच्या रूपाइतकीच ती बुद्धिमान होती.ही नर्तिका केवळ रूपगुणांनी नव्हे तर ज्ञानगुणांनीही परिपूर्ण होती. विजयाभट्टारिका ही संस्कृत भाषेत शिक्षण घेतलेली, काव्यशास्त्रात निपुण आणि नाट्यकलेत पारंगत अशी एक विदुषी होती. ती संस्कृत भाषेत पारंगत होती आणि तिच्या विद्वत्तेने अनेक राजकवीही थक्क झाले होते.प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राजघराण्यात, विशेषतः दक्षिण भारतात, राजांकडे मुख्य पत्नी त्यांना महादेवी किंवा महिषी म्हणत (पटराणी) व्यतिरिक्त काही उपपत्नी असायच्या त्यांना “उपवस्त्र” किंवा “उपपत्नि” असे संबोधले जाई.या स्त्रिया राजदरबारात केवळ राजभोगासाठी नसून, राजकीय, धार्मिक, आणि सांस्कृतिक जीवनातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. अनेक उपवस्त्र स्त्रिया यां मंदिरांना दान देत, शिलालेखांमध्ये त्यांची नावे नोंदलेली असतात, आणि काही प्रसंगी त्या स्वतः दानपत्र लिहून देणाऱ्या दात्री म्हणून गौरविल्या गेल्या आहेत.
तिने लिहिलेलं ‘कोमुदी महोत्सव’ हे पाच अंकांचं संस्कृत नाटक आज ही तिच्या विलक्षण प्रतिभेचं जिवंत उदाहरण आहे. प्रसिद्ध कवी राजशेखर यांनी आपल्या काव्यशास्त्र ग्रंथात म्हणतो
“कालिदासानंतर वैदर्भी शैलीत इतक्या सुरेखतेने काव्यरचना करणारी स्त्री जर कोणी असेल, तर ती विजयाभट्टारिका आहे.”ही प्रशंसा केवळ शब्दांची नव्हे, तर त्या काळातील स्त्रीशक्तीच्या सांस्कृतिक उंचीची साक्ष आहे.
तिच्या विद्वत्तेच्या तेजामुळे लोक तिला “कर्नाटक सरस्वती” म्हणू लागले. ती केवळ कवयित्री नव्हती; तर समाजजीवनातही सक्रिय होती.
महाराष्ट्रातील सावंतवाडी परिसरातील नेरूर गावातील शिलालेखातून दिसते की त्या प्रदेशाचे प्रशासन तिच्याकडे होते. चालुक्य काळात ही गोष्ट अत्यंत विलक्षण होती कारण एका स्त्रीला संपूर्ण प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी देणे ही तिच्या व्यक्तिमत्वाची प्रखर ओळख होती.
विजयाभट्टारिकेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे तिची दानशूर वृत्ती. ताम्रपट व शिलालेख लेख साक्ष देतात की तिने मुकटेश्वर मंदिराला तब्बल ८०० मत्तर (एकर) भूमीदान दिले. हे आजपर्यंत ज्ञात असलेले चालुक्य साम्राज्यच्या इतिहासातील सर्वात मोठे दान आहे. धर्म, कला आणि समाज यांचा संगम घडविणाऱ्या या स्त्रीने ८०० एकर भूमी दान करून आपलं स्थान इतिहासात अजरामर केलं.
शिलालेखांत तिचा उल्लेख “विनापोटिगळ” अर्थात उपवस्त्र असा आहे. हा शब्द आदरसूचक असून, समाजात तिच्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. तिचं स्थान इतकं उच्च होतं की चालुक्य राजघराण्याच्या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमध्ये तिला प्रमुख मानाने आमंत्रित केलं जाई. काही चालुक्य आणि काकतीय काळातील शिलालेखांत अशा उपवस्त्र स्त्रियांच्या नोंदी आहेत त्यांनी देवालयांसाठी भूमिदान केले, रथोत्सव आयोजित केला किंवा देवळाच्या देवदासींचे पालनपोषण केले. त्यामुळे “उपवस्त्र” या शब्दाचा ऐतिहासिक अर्थ राजकीय-सांस्कृतिक स्थानाशी निगडीत आहे, नुसत्या नैतिक संदर्भात नाही. साध्या भाषेत सांगायचं तर “उपवस्त्र” म्हणजे दुसरी पत्नी किंवा राजकीय-सामाजिक स्थान असलेली सहचारिणी होती. सुलतानच्या जनानखाण्यातील असणारी “ठेवलेली बाई” नव्हती. तर राजकीय आणि धार्मिक कार्यात सहभागी होणारी स्त्री होती
विजयाभट्टारिकेचं आयुष्य म्हणजे सौंदर्य, विद्वत्ता आणि आत्मविश्वासाचा संगम. नृत्यकलेपासून साहित्यकलेपर्यंत आणि धर्मकार्यातून प्रशासनापर्यंत तिच्या प्रत्येक कृतीत एक अनोखी नजाकत होती, एक संस्कारांचा सुवास होता. तिच्या रूपाचं तेज जसं झगमगतं, तसंच तिच्या बुद्धीचं तेजही इतिहासाच्या दगडात कोरलं गेलं आहे.विजयाभट्टारिका नर्तिका, कवयित्री, दानशूर, आणि प्रशासिका अश्या बहुआयामी कार्यामुळे अजरामर झाली तिच्यामुळे चालुक्य दरबारातील स्त्रियांना बौद्धिक आणि सांस्कृतिक स्थान प्राप्त झाले.ती केवळ विजयादित्याची प्रेयसी नव्हे, तर दक्षिण भारतातील स्त्रीप्रतिभेचे प्रतीक ठरली.तिच्या शिलालेख, नाट्यकृती आणि दाननोंदी आजही तिच्या वैभवाची साक्ष देतात.
विजयाभट्टारिका ही चालुक्यांच्या २०० वर्षाच्या इतिहासातील अशी एकमेव स्त्री ठरली जिच्या हातात नृत्याची लय आणि लेखणीची धार दोन्ही समान ताकदीने होती.ती केवळ त्या काळाची नव्हे, तर प्रत्येक युगाची प्रेरणा आहे “सौंदर्य हे अलंकार असतं, पण बुद्धिमत्ता ही तेज आहे. आणि ज्याच्यात हे दोन्ही असतात, ती स्त्री इतिहास घडवते.
विशाल फुटाणे
इतिहास व पुरातत्व संशोधक
सोलापूर
मोबा- 8888113111
