Home अपरिचित इतिहास औरंगजेब धर्मांधच होता !

औरंगजेब धर्मांधच होता !

शिवरायांनी औरंगजेबाला पाठवले होते समज देणारे पत्र

by sinhasan

औरंगजेबाचे चरित्र आणि कार्य हे काही भारतीय मुस्लिमांचा आदर्श होऊ शकत नाही. तो काही भारतीय मुस्लिमांचा मसिहा, उद्धारकर्ता किंवा प्रेरणापुरुष अर्थात महापुरुष होऊ शकत नाही. कारण त्याचे संपूर्ण जीवन धर्मसहिष्णूतेने भरलेले नाही.

औरंगजेबाचे जीवनकार्य धर्मांधतेने भरलेले आहे. त्याच्या धर्मांध भूमिकेमुळे शिवरायांनी त्याला एक समज देणारे पत्र पाठवले होते. त्या पत्रात शिवाजीराजे औरंगजेबाला म्हणतात,

तुमचे पूर्वज (अकबर) समर्थ असतानादेखील त्यांनी जिझिया कर घेतला नाही. जिझिया कर लादून जो भेदभाव तुम्ही करत आहात ते गैर आहे. धार्मिक द्वेष बाळगून धर्मवेडेपणा करणे ही ईश्वराची अवज्ञा आहे. गरीब, अनाथ जनतेला त्रास देणे यात कोणत्याही प्रकारचे शौर्य नाही. न्यायबुद्धीने पाहता कोणत्याही दृष्टीने जिझियाचे समर्थन होऊ शकत नाही.

असे प्रगल्भ विचारांचे पत्र शिवरायांनी औरंगजेबाला पाठविले होते. औरंगजेब हिंदूवर जिझिया कर लादून आर्थिक तूट भरून काढत होता; तर गरीब जनतेचे इस्लामीकरण करत होता. औरंगजेबाच्या धर्मांधतेवर शिवरायांनी कडक शब्दांत ताशेरे ओडलेले आहेत.

छत्रपती शिवाजीराजे धर्माभिमानी होते. संभाजीराजेही धर्माभिमानी होते. परंतु त्यांनी परधर्मीयांचा छळ केला नाही. त्यांचे धर्मांतर करण्यासाठी मोहीम राबविली नाही. याउलट समकालीन पोर्तुगीज प्रतिनिधी डेलनचा म्हणतो की, “शिवाजीराजे आणि त्यांची प्रजा मूर्तिपूजक असली तरी मूर्तिपूजा न करणाऱ्यांना आपल्या राज्यात आनंदाने नांदू देतात.” शिवाजीराजे, संभाजीराजे यांनी परधर्मीयांचा छळ केला नाही. त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले नाही. ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा, ही शिवरायांची भूमिका होती. शिवाजीराजांकडून धार्मिक लढाई नव्हती. राजकीय होती. परंतु औरंगजेबाकडून ती जशी राजकीय होती, तशीच ती धार्मिकही होती. औरंगजेब सक्तीने धर्मातर करत असताना शिवाजीराजे संभाजीराजे हात बांधून शांत बसले नाहीत. स्वधर्मात परत येणाऱ्या नेताजी पालकरांना त्यांनी कोणत्याही स्वकीय परकीय धर्मांधतेचा मुलाहिजा न बाळगता स्वधर्मात घेतले तर संभाजीराजांनी सक्तीने मुस्लिम झालेल्या गंगाधर कुलकर्णीला स्वधर्मात घेतले. आजच्या धर्मनिरपेक्ष-निधर्मी संकल्पना उदात्त असल्या तरी मध्ययुगीन इतिहासावर लादणे विसंगत आणि अनैतिहासिक आहे.

औरंगजेब केवळ हिंदूसाठीच धर्माध होता, असे नाही तर इस्लाममधील सुधारणावाद देखील त्याला मान्य नव्हता, प्रगल्भ विचारांचा त्याचा धर्मसहिष्णू बंधू दाराची त्याने हत्या केली. दाराच्या शिरच्छेदापाठोपाठ महान सुफी संत सर्मद याचाही शिरच्छेद केला. औरंगजेबाने शिखांमधील शेतकरी जाटांचे आणि सतनामींचे बंड चिरडून टाकले. सतनामी हे समतावादी विचारांचे होते.आग्रा कैदेत शिवरायांना ठार मारण्याचा कट औरंगजेबाने केला होता. त्यावर मात करून शिवाजी महाराज निसटले. त्यानंतर ते मथुरा, बनारसमार्गे स्वराज्यात सुखरूप पोहोचले. शिवरायांना मथुरा-बनारस येथील धर्मसंस्था आणि शिक्षण संस्थांनी आश्रय दिल्यामुळे औरंगजेबाने बनारसच्या शिक्षण संस्था एप्रिल १६६९ आणि ऑगस्ट १६६९ ला विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त केले; तर मथुरेचे कृष्ण मंदिर जानेवारी १६७० मध्ये उद्ध्वस्त केले, असे शरद पाटील डॉ. रिझवी यांना उद्धृत करतात. वरील सर्व विवेचनावरून होते की, औरंगजेब धार्मिक नव्हे, तर धर्माध होता.तो धर्मसहिष्णू नव्हे, तर धर्मवेडा होता. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना नजरकैदेत डांबले, त्यांचे हाल हाल केले. भावांच्या हत्या केल्या. पुत्र शहाजादा अकबर याला पकडून मारण्यासाठी जंग जंग पछाडले. त्याला आश्रय दिल्यामुळे संभाजीराजांवर त्याने आक्रमण केले.संभाजीराजांना पकडून आग्र्याला पाठवावे, यासाठी दिलेरखानाला फर्मान पाठवले. परंतु फर्मान मिळण्यापूर्वीच संभाजीराजे निसटले. पुढे त्यांना पकडून ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे हाल हाल करून निर्दयीपणे ठार मारले. धर्मांध औरंगजेब आणि सनातनी धर्मांध यांच्या छळाने संभाजीराजांसारख्या महापराक्रमी, महाबुद्धिमान आणि सुंदर राजपुत्राचा वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी शेवट झाला .

छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर छत्रपतींच्या कुटुंबीयांना यांना औरंगजेबाने कैदेत टाकले. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी यांनी दक्षिणेत जाऊन औरंगजेबाविरुद्ध लढा तीव्र केला.राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर (१७००) औरंगजेबाला वाटले की, स्वराज्य सहज जिंकता येईल; परंतु महाराणी ताराराणी यांनी मोठ्या धैर्याने, शौर्याने लढा दिला. औरंगजेबाने त्याचा संपूर्ण भारतातील सुमारे ५० कोटींचा खजिना मराठ्यांविरुद्ध लढण्यासाठी ओतला. त्यावेळेस मराठ्यांचा वार्षिक महसूल फक्त २ कोटी होता, मराठा हा शब्द समूहवाचक आहे. अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना ‘मराठा’ असे संबोधलेले आहे, असे मराठा इतिहासाचे भाष्यकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात.

राजारामांच्या मृत्यूनंतर व कैदेत असणाऱ्या संभाजीपुत्र शाहू महाराजांवर धर्मांतरासाठी औरंगजेबाने दबाव आणला. मातोश्री येसूबाई आणि शाहू महाराज यांच्यावर मोठे संकट कोसळले. या संकटाचा मोठ्या धैर्याने या मातापुत्राने प्रतिकार केला. शाहूराजांच्या हितचिंतक सरदारांनी मध्यस्थी केली. शाहूराजांनी धर्मांतरास नकार दिला. शेवटी शाहूऐवजी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन पुत्र खंडेराव आणि जगजीवन यांचे औरंगजेबाने धर्मांतर केले. छत्रपतींचे धर्मांतर रोखण्यासाठी या गुजर बंधूंनी मोठा त्याग केला. शिवाजीराजांचे धोरण होते. शत्रूंच्या स्त्रियांचा देखील आदर सन्मान झाला पाहिजे. शिवरायांनी शत्रूच्या स्त्रियांचा धर्माचा, धर्मग्रंथांचा धर्मस्थळांचा, शेतकऱ्यांचा लहान मुला-मुलींचा आदर सन्मान केला. औरंगजेब मात्र अत्यंत क्रूरतेने वागला.

औरंगजेबाने काही मंदिरांना देणग्या दिल्या. त्याच्याही सैन्यात हिंदू होते, असा युक्तिवाद केला जातो. एखाद्या अतिरेक्याने देवदर्शन केले,
दानधर्म केला म्हणून तो निर्दोष होत नसतो. कोणत्या सत्ताधीशांच्या सैन्यात किती हिंदू-मुस्लिम आहेत यावरून त्या सत्ताधीशाची सहिष्णुता ठरत नसते. त्या सत्ताधीशाची विचारधारा, ध्येयधोरणे लोककल्याणकारी आहेत की नाही, हे महत्त्वाचे असते. औरंगजेबाचे ध्येयधोरण, विचारधारा सार्वजनिक लोककल्याणाची नव्हती, हे स्पष्ट होते.शिवरायांचे ध्येयधोरण, विचारधारा सार्वजनिक लोककल्याणाची होती. तीच परंपरा पुढे छत्रपती संभाजीराजांनी मोठ्या ताकदीने वृद्धिगत केली. परंतु औरंगजेबाने त्यांची हत्या करून देशाचे मोठे नुकसान केले.

औरंगजेबाच्या धार्मिक धोरणावर प्रकाश टाकताना महान इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार लिहितात, औरंगजेबाने अमूक एका हिंदू देवस्थानास सनद दिली, अशा बातम्या अधून मधून वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात. त्यामुळे सामान्य माणसांचा नव्हे तर अभ्यासकांच्या मनात देखील संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी औरंगजेबाच्या धर्मनीतीबाबतचे दोन पुरावेच आम्ही सादर करतो
आहोत. औरंगजेबाचा विश्वास चिटणीस इनायतुल्ला खान याने ‘अहकाम अलमगिरी’ या ग्रंथात औरंगजेबाच्या आज्ञा नमूद करून ठेवल्या आहेत. दरबारात बादशाह जे हुकुम करत असे ते लिहून ठेवण्याचे व संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्याचे काम त्याच्याकडे होते.

औरंगजेबाचा त्याने नोंदवलेला एक हुकूम असा :
सोमनाथाचे मंदिर सौराष्ट्रात समुद्राच्या काठावर आहे. आमच्या राज्यकारभाराच्या सुरुवातीस ते उद्ध्वस्त होऊन तेथील मूर्तिपूजा बंद पडली होती. सध्या काय स्थिती आहे, माहीत नाही. जर मूर्तिपूजक तेथे पुन्हा पूजा करत असतील तर त्या मंदिराचा विध्वंस करावा. त्याची नावनिशाणी राहू नये. त्यांना तेथून हाकलून लावावे.

औरंगजेबाचा दुसरा हुकूम असा असे म्हणतात की,

सौराष्ट्रामध्ये आणखी एक मंदिर (द्वारका) आहे. ते उद्ध्वस्त करण्यासंबंधी आपल्याला लिहिण्याची मला बादशहाची आज्ञा झाली आहे.

औरंगजेबाच्या या विश्वासू चिटणीसाच्या लिखाणावर इतिहास अभ्यासकांनी विश्वास ठेवण्यास हरकत नसावी, असे डॉ. जयसिंगराव पवार ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथात नमूद करतात. असा हा औरंगजेब धर्मवेडा, धर्मांध, विध्वंसक, क्रूर आणि निर्दयी होता. तो प्रागतिक विचारांचा नव्हे तर प्रतिगामी विचारांचा होता. तो कोणत्याही समुदायाचा आदर्श होऊ शकत नाही. भारतासारख्या विशाल प्रागतिक, बहुप्रवाही, बहुसांस्कृतिक राष्ट्रांचा देखील तो आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळेच औरंगजेबाचे अर्थात औरंगाबाद या नावाचे समर्थन होऊ शकत नाही.

डॉ. श्रीमंत कोकाटे

इतिहास संशोधक, विचारवंत, व्याख्याते

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.
%d bloggers like this: